ऐतिहासिक वास्तू या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. एखाद्या गडावर गेल्यावर आजही मराठी मावळ्यांचा पराक्रम आठवून ऊर अभिमानाने भरून येतो. किल्ल्यांप्रमाणेच अजून एक महत्वाची वास्तू म्हणजे लेण्या.लेण्या त्या त्या काळातील सामाजिक,आर्थिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थितीचे संदर्भ आपल्यापर्यत पोहचवतात. ‘लेणी’ म्हणजे डोंगर, टेकडी पर्वत, खडक कोरून तयार केलेली गुहा. संपूर्ण भारतात मिळून एकूण १२०० च्या आसपास लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास ८०० लेण्या या फक्त महाराष्ट्रात आढळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील अग्निजन्य खहक हा अशा प्रकारच्या कोरीव कामासाठी अनुकूल होता. हा खडक मध्यम कठोर असून यावर कोरीव काम करणे सहज शक्य होते. घारापुरी, कान्हेरी, महाकाली अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात आहेत. अजिंठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी तर परदेशी पर्यटकसुद्धा गर्दी करतात.
या लेण्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक वास्तू आहेत. सर्वात जास्त गुहा बौद्ध धर्मियांसाठी केलेल्या आहेत. विविध धर्मांच्या आश्रयदात्यांनी त्या कोरण्यासाठी सढळ हातांनी दानधर्म केला. या लेण्या घडवण्यासाठी बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या राजांकडून ही भरघोस मदत घेतली जायची. आतापर्यंतच्या संशोधनानुसार महाराष्ट्रात लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व पहिले -दुसरे शतका पर्यंत मागे नक्कीच खेचता येईल. भाजे, कार्ले, बेडसे या लेण्या या अगदी सुरवातीच्या काळात कोरण्यातआल्या असे संशोधकांचे मत आहे. सम्राट अशोकाने अंदाजे तिसऱ्या शतकात बिहार येथे बांधलेल्या लोमसऋषि लेणीचा महाराष्ट्रातील लेण्यांच्या घडणीत प्रभाव दिसून येतो.
हिनायन आणि महायन अशा दोन कालखंडात या लेण्यांचे प्रकार प्रामुख्याने विभागले जातात. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहित धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना महत्त्व होते. बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटना चार प्रतीकांच्या द्वारे दर्शविल्या जात. जन्माचे प्रतीक हत्ती (श्वेत गज), ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र(धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रीतीने हीनयान पंथाची कला दिसून येते. हिनायन पंथ बुद्धांच्या मूळ शिकवणीचे पालन करतो. आत्म-शिस्त व ध्यान यांच्याद्वारे हे मोक्ष मिळवणे यावर भर देतात. महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमांची निर्मिती झाली. बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्रा-प्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रा, भूमीस्पर्श मुद्रा, अभय मुद्रा, वितर्क मुद्रा हे त्याचे काही प्रकार.
पूर्वीच्या काळी पावसाळ्यात आश्रय घेण्यासाठी बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी वर्ग लेण्यांचा उपयोग करत असत. ‘वर्षावास’ म्हणून सुद्धा या लेण्या वापरल्या जात होत्या. या लेण्यांंमध्ये त्या काळात प्रचलित असलेल्या ब्राह्मी लिपीमध्ये, व प्राकृत आणि संस्कृत भाषांमध्ये शिलालेख आढळून येतात. ते मुख्यत: दानलेख या स्वरूपाचे आहेत.

या लेण्यांमध्ये विहार आणि चैत्यगृह हे दोन मुख्य प्रकार असतात. तसेच पाणपोई, मंडप या सारख्या सोयी असतात. विहार म्हणजेच जिथे राहण्याची व्यवस्था असते अशी जागा. हीनयान पंथाच्या उपासकांनी इसवी सन दुसऱ्या शतकात डोंगर खोदून विहार आणि चैत्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या काळानंतरच भारतात पुण्याजवळ भाजे, कोंडाणे, कार्ले तसेच जुन्नर, बेडसे, अजिंठा, नाशिक अशा ठिकाणी चैत्यगृहे व विहारांची निर्मिती झाली.

विहार बांधताना त्यामध्ये मोठा दिवाणखाना, काही ठिकाणी शयनगृह तसेच आश्रितांसाठी निवासव्यवस्था या सुविधा असायच्या. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे.चैत्यगृहामध्ये स्तूप असतो. स्तूप म्हणजेच, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचला जायचा. मृताचे स्मारक म्हणून घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जायचे. वेदिका, अंड, हर्मिका आणि छत्रावली अशा रचनेमध्ये हे स्तूप शक्यतो बांधले जात. काही ठिकाणी निर्वाणवीथी ( स्मशानगुफा सुद्धा) पहायला मिळतात. भाजे, कान्हेरी या काही नमूद करण्यासारख्या जागा. वेरुळ ( गुफा क्र.05) व कान्हेरी ( क्र. ११) या लेण्या शैक्षणिक केंद्र असल्याचे ही समजले जाते.

कालौघात या लेण्यांच्या रचनेत अनेक बदल झाले; या मधूनच मंदिरे यासंकल्पनेचा उदय झाला व मंदिरे अस्तित्वात आली.बुद्ध धर्माचा प्रभावअसलेल्या ‘ब्राह्मणीकल लेण्या’ ही बांधल्या गेल्या.त्याची सुरुवात साधारणइसवी सन पाचव्या शतकापासून झाली असावी असे संशोधन सांगते.त्याविषयी वाचूया पुढच्या भागात…
माहिती संकलन व सर्व छायाचित्रे: ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन : स्वाती भट





